साष्ठीची बखर : सारांशलेखन

आजच्या धावपळीच्या जीवनात जून्या बखरी मिळवणे, त्या वाचणे, त्यातील वेगळी वाक्यरचना, शब्द समजुन घेत कालक्रमाने बखरीचा घटनाक्रम समजुन घेणे इतके सामान्याला जमणे कठीण. अशाने हा अमूल्य ठेवा लोप पावत जातो. म्हणून बखरीबद्दल उत्सुकता वाढावी, ज्यांना इच्छा असुनही वरील काही कारणांमुळे बखर वाचन होत नाही त्यांच्यासाठी हा सारांश रुपी लेख लिहीतोय. साष्ठीच्या बखरीत ब-याच ठिकाणांचा उल्लेख आहे जी आजही आहेत. सारांश लेख वाचून इतिहासाबद्दल आत्मियता, उत्सुकता वाढून पुर्ण बखर, इतर जुने साहित्य वाचनाची प्रेरणा मिळावी ही इच्छा!! इतिहास अभ्यासक मित्रपरिवाराने अभिप्राय/लेखातील त्रुटी मला कळवून सुधारण्याची संधी द्यावी.

साष्ठी म्हणजे ठाणे. शके १६६४ (इ.स. १७४२) मध्ये लिहील्या गेलेल्या या साष्ठीच्या बखरीचा लेखक अज्ञात आहे. कै. महादेव गोविंद रानडे याच्याकडून मिळालेली बखरीची देवनागरीतील हस्तलिखीत नकल इ.स. १७७२ मध्ये “बखर काव्येतिहास संग्रह ७” मध्ये प्रसिध्द झाली. मूळ प्रत श्री. सरनाईक इनामदार अंजूर तालुका भिवंडी यांच्याकडे आहे असे प्रसिध्द करताना तळटिपेत म्हटले आहे. बखरीत इ.स.१७८२ च्या तहाचा उल्लेख असल्याने वाढीव भाग मूळ बखरीत नंतर वाढवला आहे असे मत पडते.

साष्ठीची बखर म्हणजे ठाण्याची बखर : सारांशलेखन

ठाण्यात साधारण संभाजीराजांच्या उत्तरार्धात फिरंग्यांनी धर्मांतराचा उद्योग सुरु केला. बखरीत या जुलुमी धर्मांतराचे वर्णन दिले आहे. उदाहरण म्हणून त्या वर्णनातील हा भाग पहा “मुलखांत एखादे गावी शेंदरासा सुपारीएवढा धोंडा सापडला म्हणजे तो गांव नेऊ धरुंन बाटवावा”. अशा प्रकारच्या उच्छादाला कंटाळून वांद्रे गावचे सोळोंकी नावाचे गृहस्थ कळव्यास राहण्यास आले. त्यांनी संभाजीराजांकडे या प्रकरणाची तक्रार केली. पण स्वराज्याचा तो धामधुमीचा काळ होता. त्यात संभाजीराजांचे वीरमरण, पुढे राजाराम, शाहु अशी सत्तांतरे झाली. यात या तक्रारीचे काय झाले याबाबत बखरकाराने मौन बाळगले आहे. पुढे बाजीरावांच्या काळात बखर जाते.

कुलाब्याचे कान्होजी आंग्रे व गंगाजी नाईक यातील बेबनावाचा उल्लेख आहे. त्यासमयी शाहु महाराजांच्या आज्ञेने बाजीराव पेशवे कल्याण मोहीमेसाठी इकडे आले. बाजीरावांचे सैन्य असताना आपण मुलुखात शिरणे योग्य नाही हा विचार करुन गंगाजींनी ठाण्याची धर्मांतराची तक्रार बाजीरावांना रामचंद्रपंत महादेव यांकरवी कळवली.

मग मोहीम ठरली. त्याचे वर्णन आहे पण मोहीम कोणाच्या अंर्तगत आखली गेली याचा उल्लेख नाही. राऊत कळवेकरांनी फौज कळवा ते ठाणे, नारायणजी सुतारांनी दादरच्या खाडीतुन वसई किल्ल्यात व लाडकोजी हैबतरावांनी धारावीत नेण्याचे ठरले. नामाजी देसाई व बेंडजी देसाई यांनी वांद्रे, वेसावे कबुल केले.

रामचंद्रपंत व गंगाजी नाईक यांची भेट कल्याणला झाली. तेथुन गंगाजी १०० मनुष्य घेऊन मरोळची माडी जिंकायला गेले. ही बातमी फिरंग्याला फूटली. आणि त्यांनी घोडबंदरापासुन ते ठाण्याच्या बंदराच्या पाणबुरुजापर्यंत तारवांचा वेढा टाकला. त्या वेढ्यात गंगाजी नाईक सापडला. आणि त्यांना मदत करायला आलेल्या बाबाजी हिंदुराव व जिवाजीराव भाले यांची मिळून २०० माणसे फिरंग्यांनी धरली. त्यातली बराचश्या माणसांना दंड देऊन सोडविले. तर काहींना गोव्याला नेऊन मारले.

या प्रकारानंतर गंगाजी आणि बाजीराव यांत साष्ठीबद्दलची (ठाणे) मलसत काही ना काही कारणांनी होऊ शकली नाही. यासाठी बखरकार पुढील कारणक्रम देतो : अनामतखानाची दिल्लीवरुन आलेली स्वारी, बाजीराव-किलीजखान युध्दासाठी एका बाजुस, त्यांची अनामतखानावर फत्ते, जुन्नरला गंगाजी-बाजीराव मनसुब्याच्या तयारीत, पिलाजी जाधवरावांनी या मनसुब्याला घातलेला मोडता, बाजीराव-किलीजखान अनबन, पुढे ६ महीने बाजीराव-मोगल भांडण, रामचंद्रपंतांचे निवर्तन.

रामचंद्रपंतांनंतेर कल्याणचे अमलदार भाऊ कृष्णराव यांनी फिरंग्यांशी स्नेहाचे संबंध ठेवले. फिरंग्यांनी आपले खरे रुप दाखवत आखाडात कल्याण लुटले. यावेळी भाऊ कृष्णराव व गंगाजींनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरुन फिरंग्यांस नामोहरम करत त्याला खाडीतुन कल्याणाबाहेर हाकलले.

यापुढे २ वर्षांनी फिरंग्याला कल्याण हवे झाले त्यावरुन कांबेखाडीत झालेल्या लढाईत गंगाजीं व पिलाजी जाधवराव (बाजीरावांच्या वतीने) यांनी फिरंग्याला हरवले. तेथुन पुढे ते थेट साष्ठी जिकांयला निघाले. कळवा व पुढे ४ दिवसांत मांडवी जिकंले. जिवधन, टकमक, तांदुळवाडी, कामनदुर्ग वसविले. तेव्हा गंगाजींच्या साष्ठीतील २२ असामी फिरंग्याने पकडले. त्यांच्यासाठी फिरंग्याशी तह झाला व तुर्तास सारे शांत झाले.

नंतर कल्याणचे अमलदार म्हणून वासुदेव जोशी आले. बाजीरावांची चिमाजी आप्पांसोबत मोठ्या सरदारांची मसलत बसली. त्यात बाजीरावांच्या पुण्याच्या लोकांना गंगाजीं काय काय दाखवणार व मोहीम कशी कशी पुढे सरकणार हे ठरले. याची इत्यंभूत माहीती बखरकाराने लिहीली आहे. त्याचवेळी फिरंग्यांच्या पाद्र्यानी इकडे ठरवले की ठाण्याचा कोटाचे काम लवकर संपवू. एकदा कोट झाला की धर्मांतराचा वरवंटा परत फिरवू. यावरुन दिसुन येते की तहामुळे या मधल्या काळात धर्मांतरे थांबली असावीत.

फिरंगी ठाणे कोटाच्या कामात गुंतला. चिमाजी आप्पा सातारा तर बाजीराव हिंदुस्थानात गेले होते. सालाभरात श्रावणात गंगाजीने पुन्हा ठाण्याचा विषय पुण्यात काढला आणि अखेर मसलतीचा दिवस ठरला. चैत्र शुध्द ६ उपरांत ७. शंकराजीपंत सरदार, खंडोजी मानकर, होनाजी बाळ कवडे, कृष्णाजी नाईक, शिवाजीनायक अवघे फौजेनिशी सज्ज झाले. राजमाची, मलंग वाडी (मलंगगड?), तुंगारचे रान (तुगांरेश्वर?) अशी सारी फौज तैनात झाली. लढाईला तोंड फुटले. बुरुजक-यांना नशा देऊन ठाण्याचा पाणबुरुज घेतला. फौज माजिवाड्यातुन पुढे ठाण्यात पसरली. यावेळी आप्पासाहेबांनी बदलापूर मुक्कामी ठाण्याच्या तोफा ऐकल्या. ते तडक रात्रीच निघाले. पहाटे कळव्यास पोहचले आणि तेथे वाटेतच त्यांना पाणबुरुजाची बातमी मिळाली. त्यानी पाणबुरुजाचे नाव ‘फत्ते-बुरुज’ ठेवले. शके १६५९ पिंगलनामसंवत्सरे, माहे चैत्र शुध्द ७, रविवार दिवसी साष्ठीत लष्कराची वस्ती पडली. पुढे बखरकाराने माणिकपुरा, दादर, वेसावा, पारसिक, बेलापूर, मांडवी, जिवधन, अर्नाळा जिंकल्याची सविस्तर वर्णने लिहिलेत. सारांशलेख असल्याने ती वर्णने ईथे मी देत नाही. मांडवी, तांदूळवाडी, टकमक, वेसावे, कादुर्ग, मनोबर व बेलापूर साष्ठीत आले.

ठाण्यावर अंमल बसला पण वसईची मसलत अजून बाकी होती. त्यासाठी माहीम, शिरगावांस मराठ्यांचे मोर्चे बसले. फिरग्यांनी मोठा तिखट मारा केला. खबर लागताच आप्पासाहेब बु-हाणपुरातुन धावून आले. पण फिरंग्यांच्या ठाणे जिकंण्याच्या मनसुब्यामुळे आप्पांना साष्ठीत पाचारण केले. मग माहीमऐवजी आप्पा ठाण्याला गेले व तेथे त्यानी बळकटी केली. ईकडे धारावीच्या लढाईत फिरंग्यांची ५०० माणसे पडली आणि त्यांचे ठाणे जिकांचये मनसुबे धुळीस मिळाले.

पुढे पावसाळा आल्याने आप्पासाहेब पुण्याला गेले. पावसाळ्यानंतर फिरंगी पुन्हा ठाण्यावर चालुन आला. यावेळी मल्हारजी होळकर ठाण्याला होते. पाणबुरुजाच्या लढाईत फिरंगी हरले आणि वसईला निघून गेले. मागाहून गंगाजी नाईक व कर्णाजी शिंदे वसईला गेले. मागे पिलाजी जाधवराव, मल्हारजी होळकर, राणोजी शिंदे, राणोजी शितोळे, गणपतराव ब्राम्हण, रामचंद्र हरी व बापूजी भिवराव वसई मोहीमेच्या तयारीस लागले. इकडे खंडोजी मानकर व कृष्णाजी नाईक यांनी मडचा कोट घेतला.

आता बखरीत वसईच्या लढाईचे विस्तृत वर्णन आहे. सारांशलेखात ते मी देत नाही. थोडक्यात असे वसईत मोठी लढाई झाली. पिलाजी जाधवराव, मल्हारजी होळकर, राणोजी शिंदे, राणोजी शितोळे, गणपतराव ब्राम्हण, रामचंद्र हरी, शिवाजी नाईक यांच्या फौजा फिरंग्याविरुध्ग लढल्या. ४००० मनुष्य पडले. अखेर शके १६६१ सिध्दार्थी नामसंवत्सरे वैशाख शुध्द ९ या दिवशी फिरंगी तह करुन गोव्यास निघून गेला. वसई जिकंली !!!!

साष्ठी आणि वसई संग्रामात केलेल्या पराक्रमाबद्दल गंगाजी नाईकाल सनदा मिळणार होत्या. ते काम कसे रेगांळले याचे सकारण वर्णन बखरकार करतो. शेवटी परगणे मालाड, परगणे मरोळ, तर्फ आटगाव व परगणे साहिवान याच्या पाटिलकीच्या सनदा गंगाजीस मिळाल्या. शके १६९६ मध्ये इंग्रजांनी मुंबईहून पलटणे आणून ठाण्याचा कोट जिंकला.

सदर लेख मी माझ्या gadkot.in ब्लॉगवर प्रकाशित केला होता. आता गडकोट.इन डोमेन नसल्यामुळे इथे पुनर्प्रकाशित करत आहे.
श्रीकांत लव्हटे | www.gadkot.in | इतिहासातील दुर्ग, दुर्गांतील इतिहास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *